जळगाव समाचार | ११ नोव्हेंबर २०२५
महाराष्ट्राचे माजी मदत व पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीची अधिकृत घोषणा होताच जळगाव, धुळे आणि नंदुरबारसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पक्षकार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शांत, संयमी आणि लोकाभिमुख नेतृत्वासाठी ओळख असलेल्या पाटील यांच्या नियुक्तीला संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
दीर्घ राजकीय प्रवासात अनिल पाटील यांनी ग्रामीण विकास, शेती, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि रोजगार निर्मिती अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नंदुरबारचे पालकमंत्री असताना आदिवासी भागात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवत सर्वांगीण विकासाला गती दिली. मंत्रीपदाच्या काळात आपत्तीग्रस्तांना दिलासा, पुनर्वसन आणि प्रशासनातील कार्यक्षमतेचे त्यांनी दाखवलेले उदाहरण आजही उल्लेखनीय मानले जाते. त्यांच्या प्रामाणिक आणि विकासाभिमुख कामगिरीची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांना राज्यस्तरीय जबाबदारी सोपवली.
आपल्या निवेदनात पाटील म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेली जबाबदारी ते प्रामाणिकपणे पार पाडतील. पक्षाच्या धोरणांचा प्रसार, जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या नियुक्तीमुळे उत्तर महाराष्ट्रात पक्षाला नवी ऊर्जा आणि दिशा मिळेल, असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

![]()




