हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

 

जळगाव समाचार | १७ ऑगस्ट २०२६

हरित महाराोष्ट्र अभियानांतर्गत अनुभूती निवासी स्कूल, जळगाव वनविभाग आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व सीड्स बॉल पेरणी उपक्रम उत्साहात पार पडला. अनुभूती निवासी स्कूलच्या पाठीमागील राखीव वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४०७ येथे झालेल्या या उपक्रमात शाळेतील १८७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्थानिक वृक्षप्रजातींच्या ३०० रोपांची लागवड केली. तसेच करंज, कांचन, बूच, बांबू, रिठा आदी वृक्षप्रजातींच्या ४ हजार सीड्स बॉलची पेरणी ही केली. राखीव वनक्षेत्रातील जैवविविधता वाढविणे, स्थानिक वृक्षप्रजातींचे संवर्धन करणे आणि पर्यावरण संरक्षणाला चालना देणे, हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. हा उपक्रम जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. वृक्षारोपणावेळी अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबाशिष दास, विक्रांत जाधव, वनविभागाचे क्षेत्रीय अधिकारी स्वप्नील गोसावी, जैन इरिगेशनच्या वन व पर्यावरण विभागाचे राजेंद्र राणे, सुरक्षा अधिकारी एस. एस. भुसांडे, डॉ. समीर पवार, गार्डन विभागाचे संदीप पाटील, गिरीश जगताप, विठ्ठल बारी, शुभम काळे, अजय जाधव, आकाश कोळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्यात आला. या उपक्रमामुळे राखीव वनक्षेत्रातील हरित आच्छादन वाढण्यासोबतच जैवविविधतेच्या संवर्धनाला चालना मिळणार असून, विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग आणि पर्यावरणाविषयीची जाणीव अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here