जळगाव समाचार | २३ सप्टेंबर २०२५
जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावातील एका विवाहित महिलेने आपल्या सहा वर्षांच्या मुलीसह भादली पुलाजवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली असून, नशिराबाद पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृतांमध्ये मनीषा चंद्रकांत कावळे (२८) आणि त्यांची मुलगी गौरी (६) यांचा समावेश आहे. भवानीनगर परिसरात पती व दोन मुलींसह मनीषा वास्तव्यास होत्या. पती चंद्रकांत कावळे हे जळगाव औद्योगिक वसाहतीत एका चटई निर्मिती कंपनीत रोजंदारीवर काम करतात.
सोमवारी दुपारी मनीषा यांनी रेशनचा तांदूळ आणायचा आहे असे सांगून लहान मुलगी गौरीला सोबत घेतले व घराबाहेर पडल्या. मात्र, सायंकाळपर्यंत दोघी घरी परतल्या नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, संध्याकाळी मनमाड-भुसावळ रेल्वे मार्गावरील भादली पुलाजवळ आई-मुलीचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेहांची ओळख पटवून उत्तरीय तपासणीसाठी ते जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. मंगळवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
या दुर्दैवी घटनेमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून, पोलीस निरीक्षक आसाराम मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.