जळगाव समाचार डेस्क | १ फेब्रुवारी २०२५
धरणगाव तालुक्यातील टहाकळी गावातील १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी (२३ जानेवारी) महाविद्यालयातून घरी परतताना त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान शुक्रवारी (३१ जानेवारी) पहाटे मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
टहाकळी येथील महेश संजय पाटील (वय १८) हा पाळधी येथील नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी (एनएमकेसी) महाविद्यालयात डिप्लोमा शिक्षण घेत होता. गुरुवारी (२३ जाने.) दुपारी कॉलेज सुटल्यानंतर तो पायी घरी जाण्यासाठी निघाला होता. त्याच वेळी, त्याच गावातील प्रभाकर नामदेव पाटील (वय ४२) हे कंपनीतून घरी जात होते. वाटेत महेश भेटल्याने त्यांनी त्याला दुचाकीवर सोबत घेतले.
दोघेही राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात तयार करण्यात आलेल्या बोगद्यातून जात असताना अचानक एका अज्ञात बोलेरो पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत महेश गंभीर जखमी झाला, तर प्रभाकर पाटील यांनाही किरकोळ दुखापत झाली.
या घटनेची नोंद जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. अज्ञात बोलेरो पिकअप वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.
महेश हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. महेशच्या पश्चात आई छायाबाई, वडील आणि मोठी बहीण असा परिवार आहे. अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.