तो खून उधारीच्या वादातून…

अवघ्या २० तासांमध्ये तीन संशयित जेरबंद

जळगाव (प्रतिनिधी) : –

पंचमुखी हनुमान मंदिरामागे असणाऱ्या रणछोड नगरात ५७ वर्षीय महिलेची हत्या १० रोजी रात्री ९ वाजता उघडकीस आली होती . याचा पोलिसांनी अवघ्या २० तासांच्या आत कोळ डिटेल्सच्या माध्यमातून संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून हा वाद उधारीच्या पैशांवरून झाल्याने महिलेच्या डोक्यात हातोडा मारून तिचा खून करण्यात आल्याची कबुली संशयीतांनी दिली.

सुवर्णा राजेश नवाल (वय ५७, रा. रणछोड नगर, गणेश वाडी जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांचे पती राजेश नवाल हे दाणा बाजार परिसरामध्ये धान्याचे व्यापारी आहेत.दरम्यान गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या पूर्वी सुवर्णा नवाल ह्या घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने लोखंडी वस्तूने त्यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला असल्याचे निष्पन्न झाले होते. पती राजेश नवाल हे घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरु केला.

एलसीबीने मयत सुवर्णा नवाल यांचे मोबाईल फोनचे कॉल डिटेल्स तपासले. त्यात एका नंबरवर दिवसात सारखे ४ ते ५ वेळा फोन आल्याचे दिसले. त्या दृष्टीने तपासले असता पोलीस संशयित आरोपी लालबाबू उर्फ लाला रामनाथ पासवान (वय ४३, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांच्यापर्यंत पोहोचले.तसेच, तपासानुसार आणखी दोघे सरलाबाई धर्मेंद्र चव्हाण (वय ४२, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव), राजेंद्र उर्फ आप्पा रामनाथ पाटील (वय ५८, रा. म्हसावद ता. जळगाव) यांना ताब्यात घेतले.

दरम्यान, दि. १० रोजी सुवर्णा यांनी दिवसभरात लाला याला फोन करून उसनवारी दिलेले पैसे परत मागितले. सततच्या तगाद्याला कंटाळून अखेर लाला पासवान, सरलाबाई आणि राजेंद्र यांनी काल गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता रणछोड नगरातील सुवर्णा नवाल यांचे घर गाठले. तेथे पैसे परत मागण्यावरून महिलेशी तिघांचे वाद झालेत्यातून लाला पासवान याने सुवर्णा यांच्या डोक्यात हातोड्याचे २ जबर वार करून त्यांना संपविले. तेथून तिघे पसार झाले. दरम्यान, पोलिसांनी “कॉल डिटेल्स” काढून तिघांचा माग काढत त्यांना ताब्यात घेतले. गुन्ह्यातील हातोडा देखील जप्त करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई

सदरची कामगिरी हि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीएसआय दत्तात्रय पोटे, अतुल वंजारी, विजयसिंग पाटील, राजेश मेंढे, संजय हिवरकर, एमआयडीसीचे पीएसआय दीपक जगदाळे, पीएसआय शरद बागल, किशोर पाटील, गणेश ठाकरे, रामहरी गीते आदींनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here