मुंबई; जळगाव समाचार;
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपमधून (BJP) राजीनामा दिला आहे. त्या पुन्हा शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षात जाणार आहे. सूर्यकांता पाटील यांनी २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत त्या पक्षात प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून सूर्यकांता भाजपवर नाराज होत्या. सूर्यकांता पाटील यांनी राजीनामा देताना सांगितले की, गेल्या 10 वर्षात खूप काही शिकले. त्याबद्दल मी पक्षाची ऋणी आहे.
हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी सूर्यकांत पाटील यांनी भाजपकडे तिकीट मागितले होते. तिकीट न मिळाल्याने त्यांनी सोशल मीडियावर जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली होती. आता त्यांनी राजीनामा दिला आहे. सूर्यकांता पाटील यांनी हिंगोली-नांदेड मतदारसंघाचे चार वेळा खासदार आणि एकदा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयात त्या राज्यमंत्री होत्या. यानंतर त्यांनी संसदीय कामकाज मंत्रालयात राज्यमंत्रीपदही भूषवले आहे.
सूर्यकांता पाटील पहिल्यांदा 1980 मध्ये हदगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. 1986 मध्ये सूर्यकांता पाटील काँग्रेसमधून राज्यसभेवर गेल्या. 1991, 1998 आणि 2004 मध्ये त्या तीनदा लोकसभेवर निवडून गेल्या.