जळगाव समाचार डेस्क| २३ ऑगस्ट २०२४
रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या दिवशी रावेर तालुक्यातील ताड जिन्सी गावात एक दुर्दैवी घटना घडली. ११ वर्षीय कान्हा करणसिंग चव्हाण या शाळकरी मुलाचा नदीतील डोहात पाय घसरून बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २० ऑगस्ट) दुपारी घडली. कान्हा हा सातवीत शिकत होता आणि आपल्या चार भावंडांपैकी सर्वात लहान होता.
मंगळवारी सकाळी कान्हाने आपल्या मोठ्या बहिणीकडून राखी बांधून घेतली. त्यानंतर त्याचे आई-वडील बँकेच्या कामासाठी रावेरला गेले होते. त्यांनी कान्हाला शाळेत जाण्याचे सांगितले होते, परंतु शाळेत न जाता कान्हा आपल्या मित्रांसोबत सांबरपाठ येथील उमा महेश्वर मंदिराजवळील नदीवर गेला. तिथे त्याचे काका दिनेश चव्हाण देखील उपस्थित होते, ज्यांनी त्याला घरी जाण्यास सांगितले. मात्र, कान्हा घरी न जाता पुन्हा नदीच्या दिशेने गेला.
कान्हा घरी आल्यावर त्याने बहिणीकडे जेवण मागितले, परंतु जेवण थोड्या वेळाने मिळेल असे सांगितले असता, तो तिला न सांगता पुन्हा नदीवर गेला. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नदीतील डोहात त्याचा पाय घसरला आणि तो बुडाला. सोबत असलेल्या मुलांनी तातडीने गावात जाऊन घटनेची माहिती दिली. ३० ते ४० मिनिटांच्या शोधानंतर कान्हाचा मृतदेह सापडला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे ताड जिन्सी गावात शोककळा पसरली आहे. सायंकाळी कान्हाच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कान्हाच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर गावकऱ्यांनाही या घटनेने हादरून टाकले आहे.

![]()




