शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार! १५ संघांतील ६८५ महिला गोविंदांचा सहभाग; प्रत्येक गोविंदाला १० लाखांचा अपघाती विमा


जळगाव समाचार | ३० ऑगस्ट २०२६

नारीशक्तीचा जागर, साहसाचा थरार आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा जल्लोष… अशा अनोख्या संगमातून ‘युवतींची दहीहंडी २०२६’ येत्या शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत शिवतीर्थ मैदान (जी.एस. ग्राउंड), जळगाव येथे रंगणार आहे. भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात शाळा-महाविद्यालयांच्या १५ संघांमधून तब्बल ६८५ महिला गोविंदा सहभागी होणार आहेत.

‘नारीशक्तीचा गजर, दहीहंडीचा थरार’ ही संकल्पना घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात युवतींच्या धाडसी मानवी मनोऱ्यांचा थरार जळगावकरांना अनुभवता येणार आहे. विशेष म्हणजे सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिला गोविंदाचा १० लाख रुपयांचा अपघाती विमा आयोजकांकडून उतरविण्यात आला आहे. युवतींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा उपक्रम अधिक व्यापक आणि नियोजनबद्ध करण्यात आला आहे.

ढोल-ताशांचा निनाद अन् २१३ ढोलवादकांचा दणदणाट

दहीहंडीच्या थरारासोबतच कार्यक्रमात विविध आकर्षणांची रेलचेल असणार आहे. ‘शौर्यवीर’ आणि ‘महाबली’ या दोन ढोल पथकांमधील तब्बल २१३ ढोलवादक आपल्या दमदार वादनाने वातावरणात उत्साह निर्माण करणार आहेत. यासोबतच मर्दानी खेळ, सांस्कृतिक नृत्य, रिदमिक योगा, लाईव्ह सिंगिंग, स्लाईन डीजे, लेझर शो आणि आकर्षक फटाक्यांची आतषबाजी हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरणार आहे. तसेच शहरातील १५ रिल्स स्टार युवतीही दहीहंडीच्या उत्सवात सहभागी होणार असून, त्यांच्या सहभागामुळे तरुणाईमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे. पारंपरिक दहीहंडीला आधुनिक मनोरंजनाची जोड देत हा सोहळा जळगावकरांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.

‘संस्कृतीची जाण, उत्सवाची शान’

‘महाराष्ट्रातील एकमेव युवतींची दहीहंडी’ अशी ओळख निर्माण केलेल्या या उपक्रमामागे युवतींच्या सामर्थ्याला व्यासपीठ देण्याचा उद्देश आहे. पारंपरिक सण-उत्सवांमध्ये युवतींचा सक्रिय सहभाग वाढविण्यासोबतच त्यांच्यातील आत्मविश्वास, संघभावना, नेतृत्वगुण, साहस आणि निर्णयक्षमता यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. ‘देऊया संस्कृतीची जाण, वाढवू आपल्या उत्सवाची शान’ हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात कुटुंबासह सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रवेश विनामूल्य

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे. त्यामुळे जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवतींच्या धाडसाला आणि उत्साहाला दाद द्यावी, असे आवाहन भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here