जळगाव समाचार | १६ जुलै २०२६
बंगालच्या उपसागरात म्यानमारमधून पलायन करणाऱ्या रोहिंग्या निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या दोन बोटी बुडाल्याची भीषण घटना घडली असून, या दुर्घटनेत ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांनी या घटनेची गंभीर दखल घेत ही अलिकडच्या वर्षांतील रोहिंग्या निर्वासितांशी संबंधित सर्वात मोठी आणि प्राणघातक सागरी दुर्घटना ठरू शकते, असा इशारा दिला आहे.
‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन’ (IOM) आणि संयुक्त राष्ट्रांचे निर्वासित उच्चायुक्त (UNHCR) यांनी गुरुवारी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून प्राथमिक माहिती दिली. त्यानुसार, जून महिन्याच्या अखेरीस म्यानमारच्या संघर्षग्रस्त राखाईन राज्यातून दोन बोटी रोहिंग्या निर्वासितांना घेऊन निघाल्या होत्या. सुमारे २५० प्रवासी असलेल्या पहिल्या बोटीचा प्रवासादरम्यान संपर्क तुटला. तर सुमारे २८० प्रवासी असलेली दुसरी बोट ८ जुलै २०२६ रोजी म्यानमारच्या आययारवाडी किनारपट्टीजवळ समुद्रात उलटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दोन्ही संस्थांनी स्पष्ट केले की, या दुर्घटनांबाबत आणि मृतांच्या संख्येबाबत अद्याप अधिकृत प्रशासकीय दुजोरा मिळालेला नसला, तरी संभाव्य जीवितहानी अत्यंत गंभीर असून परिस्थिती चिंताजनक आहे.
सध्या मान्सूनमुळे बंगालच्या उपसागरात समुद्र खवळलेला असून अशा काळात समुद्रमार्गे प्रवास करणे अत्यंत धोकादायक मानले जाते. याशिवाय मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली होती. जीव वाचविण्यासाठी आणि सुरक्षित आश्रयाच्या शोधात निघालेल्या निर्वासितांनी हा धोकादायक प्रवास स्वीकारला; मात्र तो अनेकांसाठी जीवघेणा ठरला.
म्यानमारमधील संघर्ष आणि छळामुळे सध्या सुमारे १२ लाख रोहिंग्या नागरिक बांगलादेशातील निर्वासित छावण्यांमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत आहेत. म्यानमारमध्ये राहिलेल्या रोहिंग्यांवरही अनेक निर्बंध कायम आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये ६,५०० हून अधिक रोहिंग्यांनी समुद्रमार्गे पलायनाचा प्रयत्न केला होता. त्यापैकी सुमारे ९०० जण मृत्यूमुखी पडले किंवा बेपत्ता झाले होते. यंदाची दुर्घटना त्या विक्रमी आकड्यालाही मागे टाकणारी ठरण्याची भीती व्यक्त होत असून, जागतिक स्तरावर मानवी संकट अधिक गडद झाल्याचे संयुक्त राष्ट्रांनी नमूद केले आहे.

![]()





