जळगाव समाचार डेस्क | १६ जानेवारी २०२५
जळगाव तालुक्यातील म्हसावद शिवारात कामासाठी गेलेल्या एका महिलेचा पाय घसरून नाल्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (१५ जानेवारी) दुपारी घडली.
सीताबाई मस्तरिया बारेला (५५, मूळ रा. बजारीया, मध्य प्रदेश; ह.मु. जळके, ता. जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या पतीसह मागील तीन वर्षांपासून रोजगारासाठी जळके येथे राहत होत्या आणि शेतमजुरी करून उदनिर्वाह करत होत्या.
कामासाठी म्हसावद शिवारात गेलेल्या सीताबाईंचा पाय घसरून त्या नाल्यात पडल्या. नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी ही घटना त्यांच्या पतीला कळवली. महिलेला तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सीताबाईंच्या पश्चात पती, चार मुले आणि चार मुली असा मोठा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.