जळगाव समाचार डेस्क| १५ ऑगस्ट २०२४
जिल्ह्यातील प्रशासकीय आणि विनंती बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, २६३ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये २३९ कर्मचाऱ्यांची प्रशासकीय बदली, तर २४ कर्मचाऱ्यांची विनंती बदली करण्यात आली आहे. प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी ही माहिती दिली. (Jalgaon)
बदल्यांचा निर्णय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतला. या समितीत अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे आणि निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांचा समावेश होता. बदलीसाठी पात्र कर्मचाऱ्यांची यादी पूर्वीच जाहीर करण्यात आली होती.
या प्रक्रियेत १५२ तलाठ्यांची प्रशासकीय बदली करण्यात आली असून, ७ तलाठ्यांच्या विनंती बदल्याही मान्य करण्यात आल्या आहेत. तसेच, २ वाहनचालकांची बदलीही प्रशासनाने केली आहे. मंडलाधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक यांच्यासह विविध पदांवरील कर्मचाऱ्यांचा या बदल्यांमध्ये समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रशासकीय बदली प्रक्रिया सुरु असून, रिक्त जागांच्या स्थितीनुसार आणि कर्मचाऱ्यांच्या पसंतीक्रमानुसार समुपदेशन करून बदल्या अंतिम करण्यात आल्या आहेत.