जळगाव समाचार | ५ जून २०२५
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता तत्काळ तिकीट बुक करताना आधार ओटीपी (OTP) आधारित ओळख पटवणे आवश्यक असणार आहे. म्हणजेच, ज्यांचे IRCTC खाते आधारशी लिंक केलेले आहे, त्यांनाच तत्काळ तिकिटे बुक करता येतील.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, या नव्या प्रणालीमुळे तिकिट बुकिंग अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सामान्य प्रवाशांसाठी सोयीची होईल.
हा बदल लवकरच लागू होणार असून, यामागचा उद्देश म्हणजे तिकीट दलालांचा बंदोबस्त करणे आणि तत्काळ तिकिटांचा गैरवापर थांबवणे. अनेक वेळा दलाल स्वयंचलित पद्धतीने तिकिटे बुक करून सामान्य प्रवाशांना नाहक त्रास देतात. ही नवी ओटीपी प्रणाली त्याला आळा घालेल.
नवीन प्रणालीमुळे फक्त खरे प्रवासीच तिकीट बुक करू शकतील आणि शेवटच्या क्षणीही त्यांना तत्काळ कोट्यात तिकिटे मिळवणे सोपे होईल.