जळगाव समाचार | १५ मार्च २०२५
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर आणण्यासाठी स्पेस एक्स कंपनीचे यान अंतराळात झेपावले आहे. यामुळे तब्बल ९ महिन्यांनंतर ते दोघे पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे.
सुनिता आणि विल्मोर हे ५ जून २०२४ रोजी केवळ ८ दिवसांच्या मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेले होते. मात्र, त्यांच्या स्टारलायनर यानात तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना तिथेच राहावे लागले. नासाने त्यांना परत आणण्याचे अनेक प्रयत्न केले, पण यश आले नाही. स्टारलायनरचे हे पहिलेच उड्डाण होते, आणि ते अपयशी ठरले.
नासाने अखेर स्पेस एक्स कंपनीच्या मदतीने या दोघांना परत आणण्याचा निर्णय घेतला. स्पेसएक्स क्रू-10 यानाने यासाठी उड्डाण केले आहे. यानाची प्राथमिक चाचणी यशस्वी झाली असून १९ मार्चपूर्वी ते दोघे पृथ्वीवर पोहोचतील, अशी शक्यता आहे.
सुनिता आणि विल्मोर यांना आणण्यासाठी पाठवलेल्या यानातही आधी बिघाड आढळला होता. गुरुवारी स्पेस एक्सच्या फाल्कन ९ रॉकेटमध्ये समस्या आल्याने उड्डाण रद्द करावे लागले. त्यानंतर सुधारणा करून शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता यान पुन्हा प्रक्षेपित करण्यात आले.
९ महिने अंतराळ स्थानकावर राहिल्याने सुनिता आणि विल्मोर यांना पृथ्वीवर चालणेही कठीण जाणार आहे. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्याने त्यांचे स्नायू आणि हाडे कमकुवत झाली आहेत. त्यामुळे त्यांना सामान्य हालचाल करायला काही महिने लागणार आहेत.
हे मिशन नासाच्या नवीन व्यावसायिक मॉडेलचा भाग होते. यामध्ये खासगी कंपन्यांच्या मदतीने स्पेस स्टेशनपर्यंत कमी खर्चात आणि सुरक्षित प्रवास करण्याचा प्रयोग केला गेला. मात्र, यातील अनेक तांत्रिक अडचणीमुळे हे मिशन अयशस्वी ठरले.
आता अखेर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर सुखरूप पोहोचतात का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे!