जळगाव समाचार | २० फेब्रुवारी २०२६
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) यांच्या वतीने इयत्ता दहावीची राज्यस्तरीय लेखी परीक्षा आज, २० फेब्रुवारीपासून सुरू झाली असून ती १८ मार्चपर्यंत चालणार आहे. यंदा राज्यभरातून एकूण १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. त्यामध्ये ८ लाख ६५ हजार ७५० मुलं, ७ लाख ४२ हजार ७३६ मुली तसेच १३ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय ९ हजार ७८८ दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्यातील एकूण ५ हजार १११ मुख्य परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडत असून पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागांत परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार घडू नयेत यासाठी मंडळाने कडक उपाययोजना केल्या आहेत. एकूण २७१ भरारी व बैठी पथके तैनात करण्यात आली असून १९१ परीक्षा केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यापैकी ४२ केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याने तेथील शिक्षक व कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात येणार आहे, तर ५५४ केंद्रांवर अद्याप कॅमेरे बसवलेले नसल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली. मागील वर्षी गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर ३१ परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली होती. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्रे परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुण्यातील दोन विशेष गरज असलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपच्या वापराची परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, Central Board of Secondary Education (CBSE) ने दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी पहिल्या परीक्षेला उपस्थित राहणे सक्तीचे करण्यात आले आहे. पहिल्या परीक्षेला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. किमान तीन विषयांची परीक्षा न दिल्यास संबंधित विद्यार्थ्यांना ‘एसेंशियल रिपीट’ श्रेणीत ठेवून पुढील वर्षी मुख्य परीक्षेला बसावे लागणार आहे. मात्र उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तीन विषयांपर्यंत गुण सुधारण्याची संधी उपलब्ध राहणार असून या नियमांमध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

![]()




