जळगाव समाचार | ४ जून २०२५
शहरात मोकाट फिरणाऱ्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून अलीकडेच एका चार वर्षांच्या बालकाचा बळी गेल्याने या विषयाने गंभीर वळण घेतले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा गट) ने महापालिका प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांचा घेराव घालून भटक्या श्वानांच्या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या वेळी आठ दिवसांत श्वानांवर ठोस कारवाई न झाल्यास शहरातील सर्व मोकाट श्वान आयुक्तांच्या दालनात सोडण्याचा इशारा देण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील व महानगरप्रमुख शरद तायडे यांनी केले. त्यांनी आयुक्तांना निवेदन देत कठोर शब्दांत भूमिका मांडली. यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील नागरिकांमध्येही या मुद्द्यावर चिंता व्यक्त होत असून प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.