जळगाव समाचार | ९ ऑक्टोबर २०२५
पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचनजवळील सोरतापवाडी येथे बुधवारी दुपारी भीषण अपघाताची घटना घडली. शाळेची बस थांबलेली असताना पाठीमागून आलेल्या मालवाहू ट्रकमधील सळया बसच्या काचेतून आरपार घुसल्या. या अपघातात आठ शाळकरी मुले आणि एक शिक्षिका किरकोळ जखमी झाले असून, शेजारून जाणारा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. सर्व जखमींना प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले.
भांडगाव येथील ऑलम्पस शाळेतील २० ते २५ विद्यार्थी सहलीवरून थेऊरहून परतत होते. सोरतापवाडी परिसरात बससमोर अचानक दुचाकी आल्याने बसचालकाने अचानक ब्रेक दाबला. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकमधील सळया वेगाने पुढे सरकत बसच्या काचेतून आत शिरल्या. अपघातानंतर विद्यार्थ्यांना तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
या घटनेनंतर उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. कादर लाला शेख यांच्या तक्रारीवरून सळ्या घेऊन जाणाऱ्या पिकअपचा चालक विठ्ठल रघुनाथ चौधरी याच्यासह एका अन्य व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.