जिल्ह्यात १९ जूनपासून १३७ जागांसाठी पोलिस भरती प्रक्रिया…

 

जळगाव, जळगाव समाचार डेस्क;

पोलिस भरती प्रक्रियेंतर्गत १९ जूनपासून जळगाव जिल्ह्यात १३७ जागांसाठी शारीरिक चाचण्यांपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या १३७ जागांसाठी एकूण ६५५७ अर्ज प्राप्त झलेले आहेत. दरम्यान २५ जूनपर्यंत चाचण्या पूर्ण होतील. यातील शारीरिक चाचणीत उत्तीर्ण उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र होतील. चाचण्यांच्या अचूक नोंदणीसाठी या वेळी इलेक्ट्रॉनिक चिपचा वापर होणार असून यातून थोडीही तफावत राहणार नाही, असा विश्वास जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पोलिस भरतीसंदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
पुरुष व महिला उमेदवारांची चाचणी या दिवशी होणार
१९ जूनपासून पोलिस भरतीसाठी चाचण्यांना सुरुवात होणार आहे. यामध्ये पहाटे साडेचार वाजता उमेदवारांना हजर रहावे लागणार आहे. १९ रोजी पहिल्या दिवशी ५०० पुरुष उमेदवार, दुसरा दिवस २० जून ते २३ जून दरम्यान प्रत्येक दिवशी एक-एक हजार उमेदवारांना तर २४ रोजी ७२४ उमेदवारांना चाचणीसाठी बोलविले जाणार आहे. त्यानंतर २५ जून रोजी एक हजार ३६२ महिला उमेदवार व एक तृतीय पंथीय उमेदवारास बोलविले जाणार आहे.
भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना बसण्याची व्यवस्था वाहतूक शाखेनजीक करण्यात येणार आहे. तेथे अर्ज भरल्यानंतर ५०-५० जणांना पुढे पाठविले जाईल. तेथे उंची, छाती मोजणी होईल. त्यात वैध ठरणाऱ्या उमेदवारांना पुढे पाठविले जाणार आहे. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होऊन मूळ कागदपत्रे (ओरिजनस डॉक्युमेंट) जमा करण्यात येणार आहे. तेथून पुढे बायोमेट्रीक फिंगरप्रिंट घेऊन त्यांना चेस्ट क्रमांक देण्यात येईल.
उमेदवारांकडून १०० मीटर, १६०० मीटर धावणे, गोळाफेक यांचे प्रात्यक्षिक करुन घेण्यात येईल. यासाठी कोण किती वेळात किती धावले, याच्या अचून नोंदणीसाठी उमेदवारांच्या पायावर चिप लावण्यात येईल. त्यानंतर सुरूवात ते शेवट या ठिकाणी असेल्या मॅटवर त्याचा स्पर्श होईल नोंद होईल. यामुळे मायक्रो सेकंदचीही तफावत येणार नाही. तसेच यातून कोणाकडून कोणताही आरोप होणार नाही, असे डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले. ज्या उमेदवारांची चाचणी झाली, त्याच दिवशी त्यांचे गुण प्रदर्शित केले जाणार आहे.
भरती प्रक्रियेविषयी काही तक्रार असल्यास त्याची पहिले अपील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करता येईल. त्यानंतर दुसरे अपील पोलिस अधीक्षकांकडे करता येऊ शकते. यात सर्व अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यात आले असून प्रवेशपत्र (हॉलतिकीट) ऑनलाईन उपलब्ध आहे. आलेल्या एकूण अर्जांमध्ये २० टक्के महिला आहेत.
जे उमेदवार चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेला पात्र ठरतील त्यांना तसा मेसेज पाठविला जाणार आहे. बाहेर गावाहून जे उमेदवार येतील त्यांना इमर्जन्सी म्हणून मल्टीपर्पज सभागृहात राहता येऊ शकते, असेही पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सांगितले.
पोलिस भरतीसाठी उमेदवारांनी कोणत्याही व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, कारण संपूर्ण भरती प्रक्रियेवर सीसीटीव्हींची नजर राहणार असून यात कोणताही मानवी हस्तक्षेप राहणार नाही. असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here