जळगाव समाचार डेस्क| ३ ऑगस्ट २०२४
जळगावातील (Jalgaon) 3 संशयित तरुणांना पुणे येथील दरोड्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यामुळे गुन्हेगारी क्षेत्रातील अनेकांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील चतृः श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकून पसार झालेल्या जितेंद्र उर्फ जितू प्रदिप वाघ (३२), रा. वाघनगर, भूषण गोकुळ कोळी (२७), रा. समता नगर व चंद्रशेखर उर्फ चंदू रमेश देशमुख (२३), रा. महाबळ हे तिघे संशयित कानळदा गावाजवळ असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी पोकॉ रविंद्र कापडणे यांना मिळाली. त्यांनी लागलीच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना माहिती दिली. त्यावर तत्काळ कारवाई हेतू पथक तयार करुन त्यांना संबंधित स्थळी रवाना केले. या पथकाने सापळा रचून कानळदा ते भोकर रस्त्यावर गावाच्या बाहेर एका टपरीजवळ बसलेल्या तिघ संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी पुणे येथे दरोडा टाकल्याची कबुली दिली.
यांनी बजावली कामगिरी…
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदिप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोहेकॉ महेश महाजन, हेमंत पाटील, रविंद्र कापडणे, राहुल कोळी यांच्या पथकाने केली.