जळगाव समाचार | ४ सप्टेंबर २०२५
हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर तालुक्यात घडलेल्या भीषण अपघातात जळगाव (महाराष्ट्र) येथील सौ. लक्ष्मी विराणी यांचा मृत्यू झाला आहे. हिंदुस्तान-तिबेट राष्ट्रीय महामार्ग (नं. 05) वरील बिथल (कालीमिट्टी) परिसरात मुसळधार पावसामुळे डोंगरावरून दगड कोसळून एका खासगी बसवर आदळल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक पोलीस व बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून जखमींना खानरी येथील महात्मा गांधी वैद्यकीय सेवा केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या सौ. लक्ष्मी विराणी यांचा मृतदेह सध्या रामपूर उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला असून वैद्यकीय नियमांनुसार शवविच्छेदनानंतर त्यांच्या सहकारी श्री. तरुण रामचंदानी यांच्या ताब्यात सोपवला जाणार आहे. या घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्हा प्रशासनाने शिमला जिल्हा प्रशासनाशी तातडीने संपर्क साधून समन्वय केला. विराणी यांच्या निधनाने जळगाव शहरात शोककळा पसरली असून कार्यक्षेत्र, मित्रपरिवार व सहकाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो व दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांना धैर्य मिळो, अशी सर्व स्तरांतून प्रार्थना होत आहे.

![]()




