अमळनेर तालुक्यात १५ वर्षांच्या मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू ; धुपी गावात हळहळ…


जळगाव समाचार | २९ मे २०२५

अमळनेर तालुक्यातील धुपी गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. देवयानी संदीप पाटील (वय १५) या मुलीचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, २७ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.

देवयानी पाटील आपल्या कुटुंबासोबत धुपी गावात राहत होती. त्या दिवशी ती नगाव शिवारातील गट नंबर ७/१ मधील भाग्यश्री पिंगळे यांच्या शेतात गेली होती. तिथे विहिरीजवळ असताना अचानक तोल जावून ती विहिरीत पडली.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस घटनास्थळी पोहोचले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने देवयानीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आणि अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

या प्रकरणी तिचे काका रावसाहेब लोटन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण धुपी गावात शोककळा पसरली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here