दीक्षाभूमीतील भूमिगत पार्किंगचा मुद्दा चीघळला;आंबेडकरी जनतेचे तीव्र आंदोलन…

 

नागपूर, जळगाव समाचार डेस्क;

दीक्षाभूमीतील (Deeksha Bhoomi)भूमिगत पार्किंगचा मुद्दा आता अधिकच चीघळला असून त्याला आता तीव्र विरोध होत आहे. जगभरातील बौद्ध अनुयायांचे आस्थेचे स्थान असलेली दीक्षाभूमी परिसरात नागरिकांनी भूमिगत पार्किंगला (Underground Parking) विरोध दर्शवत परिसरात जाळपोळ केली आहे. दीक्षाभूमी परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या संतप्त जमावाने होत असलेल्या विकासकामाच्या साहित्याची तोडफोड केली आहे. आंदोलकांच्या मते इतर विकासकामाला आम्ही कधीही विरोध करत नसून केवळ चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या भूमिगत पार्किंगला आमचा कडाडून विरोध असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर दीक्षाभूमी स्मारक समितीने मनमानी करत लोकांना विश्वासात न घेता हे विकासकार्य केल्याचा आरोपही बौद्ध अनुयायी आंदोलकांनी केला आहे.
नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारकाच्या विकासासह परिसरातील विकासकामासाठी राज्य शासनाकडून 200 कोटीची वेगवेगळी कामे सुरु आहेत. मात्र यातील अंडरग्राऊण्ड पार्किंग हि विजयादशमी दिवशी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने हे काम तात्काळ थांबवावे, अशी आंदोलकांची मागणी आहे.त्यामुळे या पार्किंग प्रकल्पाला आंबेडकरी अनुयायांनी तीव्र विरोध केला आहे. अंडरग्राऊण्ड पार्किंग इतर विकास कामामध्ये सुरक्षा भिंत, तोरण द्वार, दगडी परिक्रमा पथ, मुख्य स्तूपाची डागडुजी आणि सौंदरीकरणाला आंदोलकांचा विरोध नसल्याचे देखील आंदोलकांनी सांगितले. यावेळी दीक्षाभूमी परिसरात मोठ्या संख्येने महिला पुरुष आणि शेकडो बौद्ध अनुयायी जमले आहे. परिणामी संतप्त जमावाने काही ठिकाणी साहित्याची नासधूस करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आंदोलनकर्त्याचा रोष लक्षात घेता पोलीस फाटा घटनास्थळी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. पोलीस आंदोलकांशी संवाद साधत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here