दीक्षाभूमीला येणाऱ्या अनुयायांना टोल माफी करण्याची प्रकाश आंबेडकरांची मागणी…

जळगाव समाचार डेस्क | ११ ऑक्टोबर २०२४

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने लाखो बौद्ध अनुयायी तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी प्रवास करतात. अशा या महत्त्वाच्या दिनानिमित्त अनुयायांकडून टोल माफ करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून टोल न घेण्याची मागणी केली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयादशमी दिनी, 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. हा दिवस जगभरातील बौद्ध अनुयायांसाठी सन्मानाचा व मुक्तीचा दिवस मानला जातो. या पार्श्वभूमीवर दरवर्षी हजारो अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी दिक्षाभूमी नागपूर, बौद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि इतर ठिकाणी प्रवास करतात.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने 12 ते 13 ऑक्टोबर 2024 दरम्यान अनुयायांकडून टोल माफ करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. राज्यातील तसेच देशभरातील ग्रामीण भागातून लोक या पवित्र स्थळांना भेट देण्यासाठी प्रवास करतात. या मागणीमुळे अनेक बौद्ध अनुयायांना मोठा दिलासा मिळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here