जळगाव समाचार | ३ जून २०२५
चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथे सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला आणि नंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. या दुहेरी मृत्यूमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.
या घटनेत विजय सुकदेव चव्हाणके (४५) आणि त्यांची पत्नी वर्षा विजय चव्हाणके (४०) यांचा मृत्यू झाला आहे. दोघेही हातगाव शिवारातील शेतात वास्तव्यास होते. काही दिवसांपासून दाम्पत्यात सतत वाद होत असल्याचे समोर आले आहे.
सोमवारी सकाळी ११:२५ वाजता विजयने आपल्या मोठ्या भावाला फोन करून पत्नीचा खून केल्याची माहिती दिली आणि स्वतःही आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. हे ऐकताच भावाने इतर कुटुंबीयांसह तातडीने शेताकडे धाव घेतली.
शेतात पोहोचल्यावर विजय हा आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला, तर वर्षा ही गुरांच्या चाऱ्यात मृतावस्थेत सापडली. तिच्या गळ्याभोवती सुती दोरी आढळून आली.
या प्रकरणी विजयच्या भावाने चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, विजय चव्हाणके यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.