जळगाव समाचार | २७ मे २०२५
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसतो आहे. केंद्र सरकारच्या ताज्या माहितीनुसार सध्या भारतात 1,000 हून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. महाराष्ट्रात 209 सक्रिय रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत राज्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या मृतांमध्ये सर्वांना आधीपासून मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे आजार होते.
मुंबईत 35 रुग्ण आढळले असून, महाराष्ट्र कोरोना रुग्णसंख्येनुसार देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे 430 रुग्ण असून, दिल्ली (104), कर्नाटक (47) आणि पश्चिम बंगाल (11) येथेही रुग्ण आढळले आहेत.
देशभरात एकूण 7 संशयित मृत्यू झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 4, केरळमधील 2 आणि कर्नाटकमधील 1 रुग्णांचा समावेश आहे. या मृत्यूमागील नेमके कारण शोधले जात आहे.
दरम्यान, कोरोनाचे NB.1.8.1 आणि LF.7 हे दोन नवीन व्हेरिएंट्स सध्या आढळले आहेत. हे प्रकार सध्या WHO ने “नजर ठेवण्यासारखे” व्हेरिएंट म्हणून ओळखले आहेत. NB.1.8.1 च्या स्पाइक प्रोटीनमध्ये विशेष उत्परिवर्तन असल्यामुळे तो अधिक वेगाने पसरतो आणि आधीची रोगप्रतिकारशक्ती यावर कमी परिणाम करते.
भारतामध्ये सध्या JN.1 हा प्रकार सर्वाधिक आढळतो. हा ओमिक्रॉनच्या BA.2.86 प्रकाराचा एक भाग आहे. या व्हेरिएंटमध्ये सुमारे 30 उत्परिवर्तन आहेत, ज्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते.
तज्ज्ञांच्या मते, JN.1 फारसा गंभीर नसला तरी लक्षणे काही दिवसांपासून आठवड्यांपर्यंत राहू शकतात. काही रुग्णांना दीर्घकालीन कोविड होण्याची शक्यता असते, ज्यामध्ये लक्षणे बराच काळ टिकतात.
आरोग्य विभागाने नागरिकांना सजग राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.