भुसावळ झोपडपट्टी सुधार क्षेत्रातील मूलभूत सुविधांचा अभाव; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर…

जळगाव समाचार | २२ मार्च २०२५

भुसावळ शहरातील झोपडपट्टी सुधार क्षेत्रातील अल्पसंख्याक रहिवाशांनी मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. गेल्या चार वर्षांपासून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. तसेच, तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

झोपडपट्टी सुधार क्षेत्रातील सर्वे नंबर 15, 16, 20, 203, 20ब, 21, 44, 43, 45, 47, 48, 49, 51, 52, 56, 85, 101, 102, 104, 106, 137, 151अ या भागांमध्ये पाणी, वीज, रस्ते, तसेच अन्य मूलभूत सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. प्रशासन नियमितपणे घरपट्टी आणि नळपट्टी वसूल करत असूनही आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रहिवाशांच्या प्रमुख मागण्या
1. शिक्षण: नगरपालिका शाळांमध्ये त्वरित आवश्यक सुधारणा कराव्यात.
2. आरोग्य आणि स्वच्छता: झोपडपट्टी भागात मलेरिया व डेंगू नियंत्रणासाठी फवारणी व स्वच्छता मोहिम राबवावी.
3. शुद्ध पाणीपुरवठा: नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा मिळावा.
4. सार्वजनिक सुविधा: अल्पसंख्याक व दलित वस्त्यांसाठी गार्डन, खेळणी व व्यायाम साहित्य उपलब्ध करून द्यावे.
5. रस्ते व वीज व्यवस्था: बंद स्ट्रीट लाईट कार्यान्वित कराव्यात आणि सार्वजनिक शौचालये, मुतारी बांधाव्यात.
6. नालेसफाई: नियमित नालेसफाई करून आरोग्यविषयक धोके टाळावेत.
7. ज्येष्ठ नागरिक सुविधा: प्रत्येक प्रभागात ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था करावी.
8. अल्पसंख्याक निधीचा योग्य वापर: निधीच्या योग्य नियोजनाने विकासकामे हाती घ्यावीत.
9. कब्रस्तान सुविधा: मुस्लिम, बोहरी, ख्रिश्चन व पारसी समाजासाठी कब्रस्तानांच्या सुविधा सुधाराव्यात.

बांधकाम परवानगीसाठी लाच घेतल्याचा आरोप

प्रभाग क्रमांक 14 मधील रहिवाशांनी बांधकाम परवानगी देताना अभियंत्यांनी लाच घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. काही नागरिकांना चुकीच्या पद्धतीने परवानगी नाकारण्यात आल्याने रहिवाशांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

51 रहिवाशांच्या सह्या; प्रशासनाला इशारा

या निवेदनावर इलियास इक्बाल मेमन, हबीब चव्हाण, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, आरिफ अब्दुल गणी, एडवोकेट ऐतेशाम मलिक, मनोज चंदन, राजू वाणी, वसीम सलीम पटेल, नजर शेख, शेख यामीन, वसीम पटेल, डॉ. मोहम्मद युनूस फलाई, डॉ. शकील अहमद, फिरोज अहमद, हरून शेख, सिकंदर खान यांच्यासह 51 रहिवाशांच्या सह्या आहेत.

पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना पाठवले निवेदन

या निवेदनाच्या प्रती पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत. जर प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही, तर पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here