जळगाव समाचार डेस्क;
गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राने राजकारणात अनेक उलथापालथ आणि अनपेक्षित साथसंगत बघितली आहे. त्यातच आज सूत्रांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकीय पार्श्वभूमीतून आणखी एक कलाटणी देणारी बातमी समोर येत आहे. समता परिषदेच्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी वेगळी भूमिका घ्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लोकसभा आणि राज्यसभेत जाण्यास उत्सुक व कदाचित पूर्ण खात्रीलायक विश्वास असताना भुजबळांना डावलल्यामुळे त्यांनी वेगळा विचार करावा, असं समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना वाटतंय. कार्यकर्त्यांनी ही आग्रही विनंती छगन भुजबळ यांच्याकडे केली, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ सत्तेतून बाहेर पडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
लोकसभेत नाशिकच्या जागेसाठी छगन भुजबळ आग्रही आणि आशावादी होते. पण त्यांना तिकीट मिळालं नाही. त्यानंतर शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांना तिकीट मिळाल. त्यामुळे भुजबळ व त्यांचे कार्यकर्ते चांगलेच नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लोकसभा हरल्यावर थेट राज्यसभेवर लागली. याही जागेसाठी छगन भुजबळ हे आशावादी होते. मात्र त्यांना याहीवेळी निराश व्हाव लागल्याच्या चर्चा रंगू लागल्या. दरम्यान या सर्व घडामोडींनंतर आज समता परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत छगन भुजबळ यांची बैठक पार पडली.
परिषदेत पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली
मुंबईच्या वांद्रे येथे छगन भुजबळ यांच्यासोबत समता परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. समता परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी छगन भुजबळ यांच्याकडे वेगळा निर्णय घेण्याची मागणी प्रामुख्याने केल्याचे समजते. आपल्यावर अन्याय झाला आहे. वेगळा निर्णय घ्या. ओबीसी आरक्षणाला धक्का देवून सरकार मराठा नेते मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्याच्या तयारीत आहे. त्याबाबतीतही आपल्यावर अन्याय होतोय. त्याचबरोबर लोकसभेतही आपल्याला डावललं गेलं आहे. त्यामुळे आता वेगळा विचार करण्याची गरज आहे. तुम्ही वेगळा विचार करा आणि निर्णय घ्या. आपल्यासाठी सध्या सर्वकाही ठिक नाही. त्यामुळे वेगळा विचार करा. हीच ती वेळ आहे, अशी मागणी समता परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केली. ही बैठक जवळपास चार ते साडेचार तास चालली.
छगन भुजबळ यांनी दिली प्रतिक्रिया
“तुम्ही रोज भेटता. मी म्हणालो का तुम्हाला की मी नाराज आहे म्हणून? अरे राजकारणात, पक्षामध्ये काही गोष्टी मिळतात तर काही गोष्टी मिळत नाहीत. ते पाहून पुढे जायचं असतं. आज नाही तर उद्या होतं. आपण काम करत राहायचं”, अशी प्रतिक्रिया बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांना दिली.