जळगाव समाचार | २३ मार्च २०२५
छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपुलावर काल शनिवारी (दि. २२) दुपारी अडीच वाजता मोठा अपघात झाला होता. उड्डाणपुलावरून जाणाऱ्या ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाल्याने ट्रक भरधाव वेगाने रिव्हर्स येत गेला. या ट्रकने उड्डाणपुलाशेजारी उभ्या असलेल्या तीन रिक्षा आणि चार ते पाच दुचाकींना चिरडले. या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाले होते, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, रिक्षाचालक सुरेश रूपचंद जैस्वाल (वय ५५, रा. राधाकृष्ण नगर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत सविस्त्तर वृत्त असे की, सुरत रेल्वेगेटजवळील मालधक्क्यावरून सिमेंट भरून निघालेला ट्रक (एमएच १९, सीवाय ७७४५) शिवाजीनगर उड्डाणपुलावरून जात असताना ब्रेक फेल झाले. त्यामुळे ट्रक उतारावरून वेगाने मागे येऊ लागला. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन रिक्षा आणि काही दुचाकींना ट्रकने धडक दिली. या दुर्घटनेत रिक्षाचालक सुरेश जैस्वाल गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रक्तस्त्राव जास्त झाल्याने रात्री ११.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला.
सुरेश जैस्वाल हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा रविवार (दि. २३) दुपारी ४ वाजता राहत्या घरून निघणार आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.