जळगाव समाचार डेस्क;
आज आषाढी एकादशी… संपूर्ण महाराष्ट्र आज या विठूमाऊलीच्या भक्तीसागरात लीन आहे. वारकरी, माळकरी, कष्टकरी आणि शेतकरी सर्वांमध्ये नवचैतन्याचे वातावरण आहे. प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे (55) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे (50) मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला. ते मागील 16 वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत.
शासकीय महापूजेनंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटले कि, मी विठ्ठलाकडे नेहमी जनतेसाठी, बळीराजासाठी मागणं मागत असतो. बळीराजा सुखी होऊ दे. चांगला पाऊस होऊ दे, चांगल पिक येऊ दे. त्याच्या जीवनात समृद्धी होऊ दे हे मागण बळीराजाकडे मागितल्याचे ते म्हटले. राज्यातील जनता सुखी होऊ दे. राज्यातील प्रत्येक घटक यांच्या जीवनात आनंदाचे दिवस विठ्ठलाने आणावे असं मागणं देखील मागितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आज सळीकडे भक्तीमय वातावरण झालं आहे. यावर्षी मागील वर्षीपेक्षा जास्त वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. पांडुरंगाच्या आशिर्वादाने राज्याचा कारभार सुरु आहे. या राज्यातील बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याचं पिक चांगलं येऊ दे, चांगला पाऊस येऊ दे शेतकऱ्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे असं मागणं विठ्ठलाला मागितल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले कि, हा माझ्या आयुष्यातील भाग्याचा दिवस आहे. कारण सलग तिसऱ्या वर्षी मला श्री विठ्ठल रुक्मिणीची महापुजा करण्याचं भाग्य लाभले. आपण सर्वजन वारकऱ्यांची भगवी पताका फडकत ठेवत आहात, त्याबद्दल आपले सर्वाचं आभार असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.