जळगाव समाचार डेस्क;
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरणे साठी मैदानी चाचणी परीक्षा दिनांक १९ जून पासून संपूर्ण राज्यभर सुरु होणार आहे. उमेदवारांना विविध पदांकरिता (पोलीस शिपाई, चालक, बँडसमन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई) एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकांत अर्ज करता येणार असल्याने अनेक उमेदवारांनी त्याप्रमाणे भरती साठी अर्ज दाखल केले आहेत. त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठचे दिवशी दोन पदांकरिता मैदानी चाचणी साठी हजर राहणे बाबत ची स्थिती निर्माण होवू शकते व त्यामुळे काही उमेदवरांची गैरसोय होवू शकते. म्हणून सर्व घटक प्रमुखांना व Mahait विभागास सूचना देण्यात आली आहे की,यात एका ठिकाणी परीक्षा दिल्यानंतर चार दिवसांचे अंतर ठेवून त्या उमेदवाराला दुसऱ्या ठिकाणी परीक्षा देता येईल, मात्र या करिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणी वेळी सादर करावे लागतील. अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
पोलीस भरती प्रक्रियेतील या सुविधेची माहिती देण्यासाठी सोमवार, १७ जून रोजी पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सांगितले की, पोलिस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी १९ जूनपासून राज्यभरात मैदानी चाचणी परीक्षा सुरु होणार आहे. जळगाव जिल्ह्यात केवळ पोलीस शिपाई या पदासाठी भरती होत आहे. मात्र राज्यात इतर ठिकाणी पोलीस शिपाई, चालक, बँडस् मन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई या पदांसाठी भरती होत आहे. त्यामुळे उमेदवारांनी विविध पदांकरिता एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकांत वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केले आहे. त्यात राज्यभरात एकाच दिवशी मैदानी चाचणी सुरू होत आहे.
‘पोलिस भरती २०२२-२३ मधे ज्या उमेदवारांनी एका पेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अश्या उमेदवारांना किमान ४ दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील. उमेदवारांना अडचण / शंका असल्यास त्यांनी raunak.saraf@mahait.org यावर ईमेल करावा’ असे सांगण्यात आले आहे.