जळगाव समाचार | ३१ ऑक्टोबर २०२५
जेमिमा रॉड्रीग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या झंझावाती फटकेबाजीच्या जोरावर भारताने महिला विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाने ८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने ठरविक ५० षटकांत ३३८ धावा केल्या.
फिबी लिचीफिल्डने ९३ चेंडूत १७ चौकार आणि ३ षटकारांसह शानदार ११९ धावांची खेळी साकारली. एलिस पेरीने ७७, तर एश्ले गार्डनरने ६३ धावांचे योगदान दिले. बेथ मुनीने २४ धावा केल्या. मात्र, अखेरच्या टप्प्यात भारताने झटपट विकेट्स घेतल्याने ऑस्ट्रेलियाला आणखी मोठा स्कोअर उभारता आला नाही.
भारताकडून श्री चरणी आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी २ बळी घेतले, तर क्रांती, अमनज्योत आणि राधा यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
३३९ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात डळमळीत झाली. शफाली वर्मा (१०) आणि स्मृती मानधना (२४) लवकर बाद झाल्या. पण त्यानंतर जेमिमा रॉड्रीग्ज आणि हरमनप्रीत कौर यांनी तिसऱ्या विकेटसाठी १६७ धावांची सुवर्ण भागीदारी रचली.
हरमनप्रीतने ८८ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांसह ८९ धावा झळकावल्या. दीप्ती शर्मा (२४) आणि रिचा घोष (१६ चेंडूत २६ धावा) यांनीही महत्त्वपूर्ण खेळी केली.
जेमिमा रॉड्रीग्जने मात्र शेवटपर्यंत क्रीज सोडली नाही. तिने १३४ चेंडूत १४ चौकारांसह नाबाद १२७ धावा करत भारताला ४८.३ षटकांत ५ बाद ३४१ धावांपर्यंत पोहोचवले आणि संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
विजयानंतर भावनिक क्षण
सामना संपताच भारतीय खेळाडूंच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले. जेमिमा आणि हरमनप्रीतच्या आलिंगनात विजयाचा आनंद आणि आठ वर्षांच्या प्रतीक्षेचा भावनिक क्षण एकत्र दिसला. संपूर्ण भारतीय संघ मैदानावर एकत्र साजरा करत होता.
विजयानंतर जेमिमाने भावनिक प्रतिक्रिया देताना सांगितले,
“या संपूर्ण स्पर्धेदरम्यान मी रोज रडले आहे. प्रचंड मानसिक दडपण होते, पण या संघाने मला उभं ठेवलं. आजचं शतक माझ्या आयुष्यातलं खास क्षण आहे.”
दरम्यान, भारतीय पुरुष संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मानेही सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले,
“टीम इंडियाच्या मुलींनी इतिहास रचला आहे. तुमच्यावर संपूर्ण देशाला अभिमान आहे.”
ऐतिहासिक पराक्रम
या विजयासह भारतीय महिलांनी वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आता भारताचा सामना अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

![]()




