जळगाव समाचार | २३ फेब्रुवारी २०२५
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली. टिप्परचालकाने पत्र्याच्या शेडवर वाळू टाकल्याने शेडचा पत्रा तुटला आणि आत झोपलेल्या पाच मजुरांच्या अंगावर वाळू कोसळली. या दुर्घटनेत गुदमरून पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास पासोडी येथे घडली.
या घटनेतील मृतांची नावे:
गणेश काशीनाथ धनवई (५०), भूषण गणेश धनवई (१५) – दोघे रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर, राजेंद्र दगडूबा वाघ (४२) – रा. दहिद, ता. बुलढाणा, सुनील समाधान सपकाळ (२०) – रा. पद्मावती, ता. भोकरदन, सुपडू मधूकर आहेर (३८) – रा. तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव
पासोडी शिवारात रस्त्यावरील पुलाचे बांधकाम सुरू होते. तेथे काम करणाऱ्या मजुरांसाठी पत्र्याचे शेड बांधण्यात आले होते. टिप्परचालक संतोष शेषराव कोल्हे याने शेडवरच वाळू टाकल्याने पत्रा तुटला आणि वाळू थेट मजुरांच्या अंगावर पडली. त्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.
बाप-लेकाचा मृत्यू, माय-लेकी बचावल्या!
गणेश धनवई हे सिल्लोड तालुक्यातून बांधकामासाठी आले होते. पत्नी संगीता या मुलगा भूषण आणि मुलगी धनश्रीला घेऊन त्यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. पहाटे अंघोळीला पाणी तापवण्यासाठी संगीता उठल्या तेव्हाच ही दुर्घटना घडली. त्यांनी मुलीला वाचवले, मात्र बाप-लेकाचा वाळूखाली गुदमरून मृत्यू झाला.
घटनास्थळावर पोलिसांनी तातडीने धाव घेतली. मृतदेह बाहेर काढून जाफराबाद ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.
टिप्परचालक संतोष कोल्हे आणि टिप्परमालक गोपाल गवळी यांना जाफराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.