भडगाव, जळगाव समाचार डेस्क;
भडगाव येथील गिरड गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १३ दिवसांपूर्वी २० जून २०२४ रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 30 वर्षीय विवाहित महिलेचा दि. 4 जुलै रोजी उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. (Suicide) तिची १३ दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. यावेळी कुटुंबाने मोठा आक्रोश केला आहे.
भडगाव तालुक्यातील गिरड गावात विलास कोळी हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. दरम्यान ते व त्यांची पत्नी शितल विलास कोळी याही मोल मजुरी करून कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यास हातभार लावत होत्या.
मात्र ३० वर्षीय शीतल कोळी यांचा पती आणि दोन मुलांसह सुखाचा संसार सुरू असतांना शीतल यांनी २० जूनला अचानक विषारी औषध प्राशन केले. शीतलने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आईच्या जाण्याने मुलांची व कुटुंबीयांची अवस्था बिकट झाली होती. त्यांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शीतल कोळी यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असे कुटुंब आहे.