जळगाव, जळगाव समाचार डेस्क;
शहरापासून नजीक असणाऱ्या रामदेववाडी येथे अंगणवाडी सेविकेसह तिच्या दोन्ही मुलांचा व भाच्याचा एका भीषण अपघातात (Accident)जागीच मृत्यू झाला होता. त्या घटनेतील आरोपी कार चालकांना पोलिसांनी अटक केली होती. आता याप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. दाखल गुन्ह्यातील तिन्ही संशयितांचा जामीन मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगरातील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आता जामीन मंजूर केला आहे. तसेच त्यांच्या विरोधात लावलेले कलम चुकीचे असल्याचे खंडपीठाने सांगितले आहे.
याआधी दोन वेळा जमीन नामंजूर…
संशयित अर्णव अभिषेक कौल, अखिलेश संजय पवार आणि ध्रूव नीलेश सोनवणे यांनी उच्च न्यायालयाच्या संभाजीनगरातील खंडपीठात जामीनासाठी वेगवेगळे अर्ज दाखल केले होते. खंडपीठात न्यायमूर्ती एस.जे.मेहरे यांच्या कोर्टात तिघांच्या जामीनावर सुनावणी झाली. न्यायमूर्तींच्या नोंदवलेल्या मतात त्यांनी म्हटले कि, सदर घडलेला प्रकार हा अपघात होता. त्यामुळे ३०४ कलम लावणे चुकीचे आहे. ते लावण्याची गरज नव्हती. दरम्यान घटनास्थळी आढळून आलेल्या गांजामध्ये अंमली पदार्थांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे संशयित आरोपींवर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी जळगावच्या जिल्हा न्यायालयात दोनवेळा जामीन नामंजूर झाला होता.
संशयितांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये काहीही आढळले नाही. त्यांच्या वयाचा आणि भविष्याचा विचार करता त्यांना कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे नमूद करून तिघांचा जामीन खंडपीठाने मंजूर केला आहे. जमीन मिळाल्यानंतर तीनही संशयितांची सुटका होऊन ते घरी परतले.